TOD Marathi

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry )यांचं दुःखद निधन झालं आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil)  यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर चारोटी येथे हा अपघात (Accidentally) झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

2019 ला टाटा समूहाच्या (Tata Group) प्रमुख पदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निमित्ताने टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी मिस्त्री यांच्या रूपाने मिळाली होती. जेव्हा रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांच्या नावाची घोषणा केली होती तेव्हा सायरस यांच्या नावाची मोठी चर्चा देखील झाली होती. कारण टाटा समूहाच्या बाहेर त्यांना सार्वजनिक जीवनात फारसं ओळखलं जात नव्हतं. मात्र, त्यानंतर रतन टाटा (Ratan Tata) यांच्या सोबतच्या वादानंतर त्यांना टाटा समूहाच्या प्रमुख पदावरून दूरही करण्यात आलं होतं.
सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालोनजी समूहाचे( Shapoorji Pallonji group) प्रमुख म्हणून कार्यरत होते. सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष पल्लोनजी मिस्त्री यांचे सर्वात लहान पुत्र होते. त्यांचं कुटुंब आयर्लंड मधील सर्वाधिक श्रीमंत भारतीय कुटुंबापैकी एक म्हणून ओळखलं जातं. सायरस मिस्त्री यांचा जन्म ही आयर्लंडमध्येच झाला होता. लंडन बिझनेस स्कूल इथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. 1991 पासून सायरस यांनी शापूरजी पालोनजी अँड कंपनीत काम सुरू केलं.

पुढे 1994 साली त्यांना याच समूहाचे पालक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वात शापूरजी पालोनजी कंपनीने प्रचंड मोठा नफा कमवला. या कंपनीने जहाजबांधणी, तेल, गॅस, आणि रेल्वे क्षेत्रातही काम केलं. दरम्यान कंपनीचा बांधकाम व्यवसाय 10 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पसरला. सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वात त्यांच्या कंपनीने भारतात अनेक विक्रम देखील प्रस्थापित केले. यामध्ये सर्वात उंच रहिवासी इमारत, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठ्या बंदराचं बांधकाम अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश आहे.
2006 साली टाटा सन्सच्या संचालक मंडळात सायरस मिस्त्री यांचा समावेश करण्यात आला