TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 ऑगस्ट 2021 -आशिया खंडातील देशांना जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीने गंभीर इशारे दिलेत. समुद्राची पातळी तापमान वाढीमुळे वाढण्याचा इशारा अहवालातून दिला आहे.

जागतिक दरापेक्षा वेगाने आशियातील समुद्राची पातळी वाढत आहे, असे अहवालात सूचित केले आहे. त्यामुळे देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरे या शतकाच्या अखेरीस पाण्याखाली जाणार आहेत, असा धोका आहे.

या शहरांतमुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे. ही शहरे शतकाच्या अखेरीस ३ फूट पाण्यात असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. जागतिक समुद्राची पातळी २००६ ते २०१८ या कालावधीमध्ये दरवर्षी सुमारे ३.७ मिलीमीटर दराने वाढत आहे.

आयपीसीसीच्या अहवालाचे अंतराळ संशोधन संस्था नासाने मूल्यांकन केले. त्यानंतर भारतातील १२ शहरामध्ये शतकाच्या शेवटी पाण्याची वाढती पातळी जाणवण्याची शक्यता वर्तविली आहे.

याअगोदर १०० वर्षात असे बदल होत होते. पण, असे बदल २०५० नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी दिसतील, असेही अहवालात नमूद केलं आहे. समुद्राच्या पातळीमध्ये २१ व्या शतकात सतत वाढ होताना दिसणार आहे. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढणार आहेत.

१९८८ पासून दर पाच ते सात वर्षांनी पृथ्वीच्या हवामान बदलाचे आयपीसीसी मूल्यमापन करत असते. यात तापमान, बर्फाचे आवरण, वायू उत्सर्जन आणि समुद्राच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केलं जातं. दुसरीकडे हिमालयातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे.

डोंगरावरील बर्फाचे आवरण कमी होत आहे. हिमालयातून उगम पावलेल्या नद्याही १९७० पासून आकुंचन पावत आहेत, असे कृष्णा अच्युत राव यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.