TOD Marathi

‘उष्ट टाकू नका आणि खरकटं खाऊ नका’ ही स्वर्गीय अंकुशराव टोपे यांची शिकवण राजेश टोपे विसरले! – बबनराव लोणीकर यांची टीका

टिओडी मराठी, दि. 12 जून 2021 – स्वर्गीय अंकुशरावजी टोपे यांच्या कारकिर्दीत नेहमी सांगत होते की ‘उष्टे टाकू नका आणि खरकटे खाऊ नका’ परंतु स्वर्गीय अंकुशराव टोपे यांची हीच शिकवण त्यांचे पुत्र राजेश टोपे पूर्णपणे विसरले आहेत, अशी घणाघाती टीका माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उटवद येथे 132 केव्हीचे उद्घाटन केले. खरे पाहता तत्कालीन पालकमंत्री  बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून नेर (ता. जालना) येथे मंजूर असलेले 132 केव्ही येथे पळवून नेण्याचे पाप राजेश टोपे यांनी केले आहे. मंजूर असलेल्या या प्रकल्पाचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.

त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु राजेश टोपे यांनी स्वतंत्र 132 के व्ही मंजूर न करता सात-आठ वर्षांपूर्वी बोगस नारळ फोडण्याचे पाप राखण्याकरिता नेर येथे मंजूर असलेले 132 के व्ही उटवद येथे पळवून नेण्याचे पाप राजेश टोपे करत आहेत, असे बबनराव लोणीकर म्हणाले.

माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांनी तत्कालीन पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात घनसावंगीमध्ये चार 33 केव्ही, पालकमंत्री राजेश टोपे यांचे जन्मगाव असणाऱ्या पाथरवालासह अनेक गावांना डांबरीकरणाचे रस्ते, अनेक गावांना पाणीपुरवठाच्या योजना यासह अनेक गावांच्या विकासासाठी प्रयत्न केले होते.

त्यामुळे “पालकमंत्री असावा तर बबनराव लोणीकर यांच्या सारखा” अशी जनभावना तयार झाले होते. त्यामुळे राजेश टोपे यांचे 27 हजार पेक्षा अधिक मताधिक्‍य घटले असल्याचा राग राजेश टोपे यांच्या मनात आहे. त्यामुळे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंजूर केलेले प्रकल्प इतरत्र पळवण्याचा प्रयत्न राजेश टोपे करत आहेत, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

धमक असेल तर पालकमंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी जालना जिल्ह्याचा स्वतंत्र विकास करावा. जिल्ह्यात 220 केव्ही, 132 केव्ही, 33 केवही एवढेच काय तर पाथरवाला येथे विमानतळ मंजूर करावे. आमचा पालकमंत्री राजेश टोपे यांना जाहीर पाठींबा असेल असा उपहासात्मक टोला देखील लोणीकर यांनी हाणला.

पालकमंत्री राजेश टोपे यांनी सर्वसामान्यांसाठी विकासाचे जाळे निर्माण करावे, धमक असेल तर बबनराव लोणीकर यांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामापेक्षा अधिक कामे मंजूर करावीत, परंतु जनतेच्या विकास केल्याचा राग मनात ठेवून लोणीकर यांनी मंजूर केलेली कामे इतरत्र पळवू नयेत.

पालकमंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगीसह जालना जिल्ह्याचा अधिक विकास करून दाखवावा त्यांचा जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सत्कार करू, असे आव्हान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

आम्ही हे केले : बबनराव लोणीकर
आपण पालकमंत्री असताना जालना आणि परतूर येथे 220 के व्ही वीज केंद्रे तर जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास 33 केव्ही उपकेंद्रे मंजूर केली. तात्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आम्ही पालकमंत्री असताना जालना येथे 170 कोटी रुपये खर्चून 220 केव्ही वीज केंद्र उभारले तर परतूर येथे 57 कोटी रुपये खर्चून 220 के व्ही वीज केंद्राची उभारणी केली.

त्यासह जिल्हाभरात 33 केव्ही ची 49 वीज उपकेंद्रे मंजूर केली होती, त्यातील 19 वीज उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हाभरात विजेचे जाळे निर्माण करून शेतकऱ्यांचा विजय संदर्भातला जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले आहेत, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

पालकमंत्री राजेश टोपे यांचा हा बालिशपणा
पालकमंत्री राजेश टोपे यांनी नेर येथे मंजूर असलेले 132 केव्ही पळून उठवत येथे घालवण्याचा बालिशपणा सुरू केला आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, ही बाब सोयीस्करपणे पालकमंत्री राजेश टोपे विसरले आहेत.

स्वतः सह ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांना देखील पालकमंत्री राजेश टोपे यांनी पापाचे भागीदार केले आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते नारळ फोडण्याचा घाट राजेश टोपे घालत आहेत, अशी टीका देखील बबनराव लोणीकर यांनी केली आहे.