TOD Marathi

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविषयीची आपली भूमिका गेल्या तीन चार सभांमध्ये स्पष्ट केली. 4 मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलनही होणार होते मात्र त्यापूर्वीच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या होत्या. याची गंभीर दखल राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं, कशासाठी? ध्वनि प्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी ! असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात लिहिलय की, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेल्या आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदिंमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदिप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

शेवटी, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.