TOD Marathi

मुंबई:

भिवंडी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या कातकरी कुटुंबातील दोन मुलांना किरकोळ मोबदल्यात वेठबिगारी करण्यास भाग पाडलं होतं. ज्यांनी हे कृत्य केलं होतं त्या मेंढपाळांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. आणि या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray write a letter to government) यांनी राज्य सरकारला जाब विचारला आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी राज्य सरकारला (Maharashtra State government) एक पत्र पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे पत्रात म्हणतात.. 

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा. ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

‘हा’ प्रकार नक्की काय?

पडघ्याजवळील सागपाडा-वाफाळे येथील एका १२ वर्षांच्या मुलास पारनेरच्या ढवलपुरी (अहमदनगर जिल्हा) येथील मेंढपाळ संभाजी खताळ याने दीड वर्षांपूर्वी केवळ ५०० रुपये महिना वेतनावर मेंढ्या राखण करण्यासाठी नेले होते. अधून मधून त्याला घरी सोडले जात होते. त्यासोबत कधी हजार, कधी दीड हजार रुपये त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आले. मात्र त्या व्यतिरिक्त कोणताही अन्य मोबदला देण्यात आला नाही, अशी तक्रार त्या मुलाच्या आईने नोंदवली आहे. याच पद्धतीने दुसऱ्या घटनेत भिवंडी तालुक्यातील वडवली खोताचा पाडा येथील एका १७ वर्षीय कातकरी मुलास कर्जत येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने ५०० रुपये महिना मोबदला देण्याचे कबूल करून मेंढ्यापालन करायला नेले. तिथे त्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याने तो घरी परत आला. या दोन्ही प्रकरणामध्ये वेठबिगारी कायद्याचे उल्लंघन तर झालेच मात्र अल्पवयीन मुलांकडून (Child labour) काम करून घेण्यात आले. यामध्ये श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने पडघा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पुढील कार्यवाही सुरू केली होती.