TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 ऑगस्ट 2021 – संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत झालेली नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधक पेगासस हेरगिरी, कृषी कायदे, बेरोजगारी, कोरोना या मुद्द्यांवरुन संसदेमध्ये सत्ताधारी सरकारला धारेवर धरले आहे. यामुळे आता लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधक आणि सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. संसदेची कार्यवाहीबद्दल बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, सभागृहामध्ये अपेक्षेप्रमाणे कार्यवाही झालेली नाही.

केवळ 22 टक्के काम झालं आहे. अधिवेशनामध्ये आतापर्यंत संविधानाच्या 127 व्या सुधारणा विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर केली आहे. 66 प्रश्नांची तोंडी उत्तरे दिली असून सदस्यांनी नियम 377 अंतर्गत 331 बाबी मांडल्यात.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनीही विरोधकांनी जोरदार निशणा साधला. या पक्षाला दोन वर्षांपासून आपला अध्यक्ष निवडता येत नाही. यांचे खासदार आपल्याच सरकारचे विधेयक फाडतात.

रस्त्यावर जे काम करायला लाज वाटेल, ते काम यांनी संसदेत केलं आहे. लोकशाहीला लाजवेल, असे कृत्य यांनी केलं आहे. लाखो रुपये खर्च करुन अधिवेशन भरवलं जात आहे.

हे लोक जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी गोंधळ करुन संसदेतून निघून जात असतात. काल राज्यसभेत अगोदर कागद फाडले. त्या नंतर अध्यक्षांच्या खुर्चीवर फाइल फेकली, हे लाजीरवाणे आहे, अशा शब्दात अनुराग ठाकुर यांनी विरोधकांवर टीका केली आहे.