TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 जून 2021 – यंदा राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे कोरोनामुळे दोन दिवसाचे असणार आहे. मात्र, अधिवेशनाचा काळावधी वाढवावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. तरीही पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच करण्यावर राज्य सरकार ठाम आहे. असे असले तरी विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनिती ठरवली आहे. आज भाजपने मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

भाजपाची बैठक पार पडल्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं कि, दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली आहे. राज्यासमोर खूप प्रश्न आहेत. अधिवेशन अधिक कालावधीत झालं असतं तर जनतेला न्याय देता आला असता. पण, यापेक्षा कमी कालावधी अधिवेशन ठेवल्याने जनतेला न्याय देता येणार नाही.

तरीही शेतकरी आणि आरक्षण या मुद्यावर आम्ही सरकारला धारेवर धरणार आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. आम्ही कोरोनापासून तर आरक्षण या सर्व मुद्दयांवर सरकारला घेणार आहे, याची तयारी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये पोट निवडणूक होणार असून त्यात विजय मिळवण्याची रणनीती तयार केलीय. अगोदर निवडणूक जाहीर होऊ द्या. आमची रणनीती ठरलीय. त्यांनी अगोदर निवडणूक घोषित करण्याची हिंमत दाखवावी, असेही आशिष शेलार यांनी म्हटलंय

राज्यातील अनेक शहर आणि जिल्ह्यांत लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झालं आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. जगातील लोक केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेत आहे. मात्र, राज्य सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. सभागृहात सर्व विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.