TOD Marathi

टिओडी मराठी, रत्नागिरी, दि. 27 ऑगस्ट 2021 – मुंबईतून १९ ऑगस्टला सुरु झालेली जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीमध्ये शुक्रवारी पोहोचली. सिंधुदुर्गमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत घेत नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. नारायण राणेंनी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लागवण्याचे वक्तव्य केले, त्यानंतर शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून महाडच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये नारायण राणेंना जामीन मंजूर केला होता.

आता दोन दिवसानंतर पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली आहे. जगाच्या पाठीवर घरात राहून पिंजऱ्यामध्ये राहून कोणी सत्ता चालवली नाही. तसेच संजय राऊत आणि विनायक राऊत हे शिवसेनेला बुडवतील, असे नारायण राणे म्हणाले.

घरात घुसून राज्यामध्ये बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहेत, खून, मारामाऱ्या होत आहेत, हे विसरु नका. सुशांतची हत्या झाली, दिशा सॅलियनची बलात्कार करुन हत्या झाली आहे,. याचे आरोपी अजून मिळाले नाहीत, असे अनेकजण आहेत. यात खरे आरोपी मिळत नाही आणि मिळणारही नाहीत. नारायण राणेच्या पाठी लागू नका. अन्यथा, सगळंच बोलावे लागेल आणि ते परवडणार नाही. मी एवढा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होतो, तर मला मुख्यमंत्री कसे का केले?. मंत्रीपद कसे काय दिले?, असा सवाल देखील नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

नारायण राणे म्हणाले, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. पण, काहीजण सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. आम्ही देखील भविष्यात महाराष्ट्राच्या सत्तेत येऊ, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वात अधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेत. ही यांची ख्याती आहे. येथे सभा घेऊ नका, तिथे जाऊ नका, ही बंधने माझ्यासाठी आहेत, अशी मनाई कोरोना होता, तेव्हा का झाली नाही?, असा सवाल ही उपस्थित केला.