TOD Marathi

टिओडी मराठी, आळंदी, दि. 18 जुलै 2021 – कोरोनाच्या संसर्गमुळे राज्य सरकारने पायीवारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतलीय. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका सोमवारी (दि.19) सकाळी नऊच्या सुमारास आळंदी मधील आजोळ घरातून पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. दोन एसटी बसद्वारे अवघ्या चाळीस व्यक्तींसोबत विनाथांबा ही वारी वाखरीपर्यंत नेणार आहे.

या दरम्यान वारीच्या प्रवास मार्गांवर गावोगावी चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे. प्रशासनाकडून संपूर्ण वारी ने – आण करण्याची जबाबदारी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यावर सोपविली आहे.

तर, माऊलींच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या शिवनेरी बसचे सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शीरसाठ व रामचंद्र नामदेव ईधारे हे करणार आहेत.

कोरोनामुळे खबरदारी म्हणून मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पायी वारी सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीमध्ये नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.

त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर, तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे प्रस्थान केले होते. मात्र, त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू आणि आळंदी मध्येच मुक्कामी आहेत.

या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चलपादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून दोन शिवनेरी बस उपलब्ध करून देणार आहेत. या बसमध्ये प्रत्येकी वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिलीय.

विशेष म्हणजे पादुकांसोबत पासष्ट वर्षांच्या आतील निमंत्रित व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. संबंधित व्यक्तींची कोरोना टेस्ट केलेली असावी, असे सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे – पाटील यांनी सांगितले आहे.

यंदा आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे, असे नमूद केले आहे.

मानाच्या पालखी सोहळ्यांना प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी इथं पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे 1.5 किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी केली जाणार आहे. काल्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पौर्णिमेच्या (दि. 23) दिवशी वारी परतीसाठी आळंदीकडे प्रस्थान करणार आहे.