TOD Marathi

टिओडी मराठी, पाटणा, दि. 7 ऑगस्ट 2021 – मागील काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीत फूट पडल्यानंतर एकाकी पडलेल्या चिराग पासवान यांनी आता नितीश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडण्यास सुरुवात केलीय. यादरम्यान, नितीश कुमार हे पंतप्रधान बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजप आणि जेडीयूमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे राज्यामध्ये मध्यावधी निवडणूक लागणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत लोकजनशक्ती पार्टीने निवडणुकीची तयारी सुरू केलीय, असे चिराग पासवान यांनी म्हंटलं आहे.

चिराग पासवान नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले, नितीश कुमार यांना पंतप्रधानपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, ते त्यांच्या मनातील गोष्ट अन्य नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त करतात. नितीश कुमार वारंवार भाजप व केंद सरकारविरोधात काम करत आहेत. त्यामुळेच भाजप आणि जेडीयूमध्ये तणावाचे वातावरण आहे.

पेगॅसस प्रकरणामध्ये तपास करण्याची केंद्र सरकारची इच्छा नाही आहे. मात्र, नितीश कुमार विरोधकांच्या सुरात सूर मिसळून याचा तपास करण्याची मागणी करत आहेत.

तसेच जातींवर आधारित जनगणना, एनआरसी, लोकसंख्या नियंत्रण कायदा अशा निर्णयावरून नितीश कुमार केंद्र आणि भाजपला विरोध करून पंतप्रधान बनण्यासाठीच्या आपला हेतूने आपली महत्त्वाकांक्षा एनडीएवर थोपवत आहे.

नितीश कुमार यांची हीच महत्वाकांक्षा बिहारमध्ये मध्यावधी निवडणुकीचे कारण ठरेल, असा दावाही चिराग पासवान यांनी केलाय.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा पक्ष एकटा निवडणूक लढला होता. तरीही पक्षाला सहा टक्के मते मिळाली होती. जर आम्ही सर्व जागा लढवल्या असत्या तर आमच्या मतांचा शेअर दुप्पट झाला असता, असे ते म्हणाले.

राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री झालाय. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्याच्या अगदी विरुद्ध राज्यात गुन्हेगारी व भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. दररोज हत्या घडताहेत. लोकप्रतिनिधीही येथे सुरक्षित नाहीत, असा टोला चिराग पासवान यांनी लगावला आहे.