TOD Marathi

नागपुर: स्वातंत्र्यवीर सावरकर जर मोठे ठरत नसतील तर या देशात मग कोणीही मोठे ठरू शकणार नाही, एवढा मोठा त्याग त्यांनी मातृभूमीसाठी केला आहे. मात्र, कायम त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. (Swatantra Veer Sawarkar) 1947 नंतर असं होण्याची कारणं वेगळी होती मात्र अजूनही तसेच होत असेल तर हे दुर्दैव आहे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

भारतीय स्वातंत्र्यावर प्रकाश टाकणाऱ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी नागपुरात पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

‘बाबासाहेब पुरंदरे नसते तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला नसता. डॉ. हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. मात्र, योग्य माहिती नसल्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होतात. आजच्या पिढीला आणीबाणी किंवा सत्याग्रह (Emergency and Satyagrah) याबद्दल काहीही माहिती नाही. आपला जुना इतिहास नव्या पिढीकडे नेण्याचं काम आपण इंग्रजांकडून शिकावं, एवढ्याशा इंग्लंडने संपूर्ण जगावर कसे राज्य केलं असेल, हा संशोधनाचा विषय आहे.

आपल्याला आपल्याच गोष्टींचा अभिमान नाही, भारतीय संस्कृतीचं जगात जेवढं आकर्षण आहे तेवढं आपल्या देशात नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले. (Union Minister Nitin Gadkari was in Nagpur)

स्वातंत्र्याच्या इतर इतिहासाबरोबरच आर्थिक इतिहासाचेही लेखन केले जावे. देशाच्या निर्माणात आर्थिक दृष्टिकोनही तेवढाच महत्त्वाचा आहे. साम्यवाद, समाजवाद, भांडवलवाद आता संपुष्टात आला आहे. अमेरिकन मुक्त अर्थव्यवस्था अयशस्वी ठरली आहे. अंत्योदयाच्या तत्त्वावर सामाजिक व आर्थिक परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.