TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 3 जुलै 2021 – केंद्राने सतत केलेली इंधन दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ आणि वाढती महागाई यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटकाही सामान्यांना बसत आहे. त्यामुळे याला विरोध म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यात ‘महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना नियमाचे पालन करण्यात आले.

नोटबंदी या केंद्र सरकारने लादलेल्या कृत्रिम आपत्तीमुळे जनता त्रस्त झाली होती. त्यात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे आणखी जनता त्रस्त झाली आहे. त्यातच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीचे धोरण राबवत आहे. याचा फटकाही सामान्यांना बसत आहे.

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने योग्य धोरणे राबवून सामान्यांना दिलासा दिला नाही, तर राजकीय पक्षच नव्हे, तर सामान्य जनताही रस्त्यावर उतरेल. आणि या केंद्रातील सत्तेत असणाऱ्या भाजप नेत्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

सत्तेवर येताच भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या आहेत. जनतेची दुर्दशा पाहण्यातच हे नेते समाधान मानत आहेत. सामान्य जनता रस्त्यावर उतरल्यास भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा शनिवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावेळी देण्यात आला.

मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या महागाईवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर ‘महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन’ केले. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला या आंदोलनास उत्तम प्रतिसाद मिळाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची भाषणे झाली. आंदोलनास महेश हांडे, महेंद्र पठारे, प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी, नीलेश निकम, बाळासाहेब बोडके, सर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ,कार्यकर्ते आणि नागरिक आदी उपस्थित होते.

काही महिन्यांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. गरज असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सहा महिन्यांत १४० रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल प्रति लीटर १०५ रुपयांवर गेले आहे.

दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. एकीकडे नोटबंदीमुळे अनेकांना रोजगार गमवावे लागले. त्यातच कोरोनासारख्या साथरोगाची भर पडलीय. सामान्य जनतेला जीवन जगण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देणारे धोरण स्वीकारणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु, सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या आणि केवळ धनदांडग्यांचे हितसंबंध जोपासणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून सामान्यांना आणखी अडचणीच्या खाईत लोटण्याचे धोरण स्वीकारलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याचा निषेध नोंदविण्यात आला. केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला नाही, तर सामान्य जनता रस्त्यावर उतरेल. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिला आहे.