TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जून 2021 – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं होतं, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. तसेच ‘सुशांत सिंगची आत्महत्या नव्हती तर, मग हत्यारा कोण आहे? हे सीबीआयने सांगावे’ असा सवालही नवाब मलिकांनी उपस्थितीत केलाय.

आज सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण झालं आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप केले होते. एवढंच नव्हे सीबीआय चौकशीची मागणीही केली होती. पण, वर्षभराच्या तपासानंतर याप्रकरणी सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही. या मुद्यावरून नवाब मलिक यांनी भाजप आणि सीबीआयवर निशाणा साधला.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती. म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले होते, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला. त्यानंतर ही केस सीबीआयकडे दिली होती, परंतु निष्पन्न काय झालं? असा सवालही नवाब मलिक यांनी केलाय.

एक वर्षानंतर अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केलीय.