TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 4 जुलै 2021 – एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका, राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमले तर हे इतरांपर्यंत पोहचवा, अनेक जीव वाचतील, असा उल्लेख करीत स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर, त्यांना आत्महत्येचे दुःख काय असते? ते समजले असते, अशा शब्दांत स्वप्नीलच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

स्वप्नीलच्या आई म्हणाल्या, जर एका मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर त्यांना जाग आली असती की नाही. दुसऱ्याच्या जीवाचा सुद्धा विचार करावा. आज आमच्यावर काय परिस्थिती आली. आम्ही त्याला मोठे केले त्याला शिकवले.

आज नोकरी मिळण्याअगोदर सरकारने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. केवळ यांची भांडणे, जगात काय चालले याचे यांना काही देणेघेणे नाही, केवळ राजकारण आणि राजकारण.

माझा मुलागा माझ्याशी बोलत होता. तो म्हणायचा आई माझी मुलाखत झाली नाही. गरीबांच्या मुलांचे यांना काही देणेघेणे नाही. त्यांची मुले आहेत सुरक्षीत आहेत.

स्वप्नील लोणकर हा एमपीएससीची 2019 ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला होता. मात्र, मागील दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे तो निराश होता.

त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परीक्षा दिलेली होती. ती पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. एमपीएसीसीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नाही, म्हणून त्याला नैराश्य आलं होतं.

घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावू शकत नाही. या नैराश्यातून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा आणि नोकऱ्यांबाबतच्या राज्य सरकारच्या चालढकलीच्या भूमिकेवर आता प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.

आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्वप्नील लोणकरने असं म्हटले आहे की, कोरोना साथ नसती आणि परीक्षा सुरळीत झाल्या असल्या तर आज आयुष्य खूप वेगळं असते. हवे ते, ठरवले ते प्रत्येक साध्य झालं असते. मी घाबरलो, खचलो नाही, केवळ मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता.