TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 6 ऑगस्ट 2021 – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे वारंवार स्थगित होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा येत आहे, अशी खंत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलीय.

याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्‌विट केलं आहे. या ट्‌विटमध्ये त्यांनी असं म्हटले आहे की, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सभापती महोद यांनी तीन वेळा मला प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला.

मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकाही काही विषयांवर संघर्ष सुरु आहे. तसेच असमन्वयामुळे त्याचे पडसाद सभागृहात उमटत आहेत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित होत असल्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप संसदेत मांडता आला नाही.

यांसह इतरही अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी सामंजस्याने एकत्रित बसून विषय सोडवावेत. मात्र, त्यासाठी संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये, असे आवाहन त्यांनी केलं आहे.