TOD Marathi

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 19 ऑगस्ट 2021 – पश्चिम बंगाल राज्यामधील निवडणुकांनतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला झटका देत कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत.

याशिवाय कोलकाता उच्च न्यायालयाने हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही दिलेत. पश्चिम बंगाल संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश असणार आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल सरकारने हिंसाचाराच्या घटनांच्या सीबीआय चौकशीला विरोध केला होता. अशा परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर राज्यातील मतदानानंतरच्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याच्या याचिकांवर सुनावणी झाली.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर हिंसाचारादरम्यान झालेल्या हत्या, बलात्काराच्या प्रकरणांची उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केलीय.

सीबीआय व एसआयटीचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार आहे. न्यायालयाने सीबीआयला ६ आठवड्यांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.