TOD Marathi

टिओडी मराठी, पालघर, दि. 20 ऑगस्ट 2021 – एखादी वास्तू, प्रकल्प, योजना या लोकांच्या श्रमाच्या, घामाच्या पैशांतून उभ्या राहतात. आपल्याला मिळतो तो पगारही जनतेच्या पैशांतून दिला जात आहे, याची जाणीव आमच्यासह सर्वांनी ठेवून जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

पालघर हा नवनिर्मित तरुण जिल्हा आहे. या जिल्ह्याला विकासाच्या धर्तीवर बळ देण्याचे काम महाविकास आघाडी करणार आहे. देशात पालघर जिल्हा सर्वोत्तम जिल्हा आहे, असे आपल्या कामातून दाखवून देऊया, असे सांगून आपला पालघर जिल्हा विविधतेने नटलेला संपन्न जिल्हा आहे. आपण एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदी उपस्थित होते.

तर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण आदी उपस्थित होते.

पालघर जिल्हा आणि वसई-विरारच्या विकासाचा नवा आराखडा तयार केला आहे. तो मुख्यमंत्र्यांपुढे सादर केल्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजेंद्र गावित सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी देखील आपली मते व्यक्त केली आहेत.

अशी आहे पॅलेसच्या धर्तीवर रचना –

  • – संपूर्ण देशात एक रोल मॉडेल ठरेल अशा, १०३ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर, जव्हारच्या मुकणे महाराज संस्थानच्या जयविलास पॅलेसच्या धर्तीवर सिडकोने मुख्यालयाच्या इमारतीची रचना केलीय.
  • – ही वास्तू उभारण्यात आपण यशस्वी झालो आहे. तरी या निर्जीव वास्तूला आपल्या कार्यातून जिवंतपणा आणण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
  • – पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात रोल मॉडेल ठरणार आहे, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.