TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 21 ऑगस्ट 2021 – सध्या भाजपकडून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केलं आहे. या यात्रेदरम्यान भाजप नेते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहचवत आहेत. या यात्रेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यात आता आपण जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रामध्ये अपयशी ठरले आहे, असे असतानाही जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले आहे.

वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, कोरोना काळात आलेले अपयश, पेगॅससच्या माध्यमातून केलेली हेरगिरी या सर्व गोष्टींचा उहापोह या पत्रकार परिषदेमध्ये करणार आहे.

याशिवाय ओबीसी आणि मराठा आरक्षणात केंद्रसरकार कशी चालढकल करुन राज्यात तेढ निर्माण करत आहेत, हेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या यात्रेविरोधात ३६ गुन्हे नोंदवले आहेत. भाजप नेत्यांनी या यात्रेदरम्यान गर्दी करत शक्तिप्रदर्शन केलं आहे. तसंच यावेळी करोना प्रतिबंधाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याची नोंद झाली आहे.