TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 29 जुलै 2021 – पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दल ‘अरे-तुरे’ चे शब्द वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांचे कान टोचलेत.

मुख्यमंत्री एखादी पाहणी करण्यासाठी जात आहेत, त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहतात. मग, कुणीही मुख्यमंत्री असेल तर तसेच होणार. नैसर्गिक संकट काळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात, असा मोलाचा सल्लाही अजित पवार यांनी भाजपला दिलाय.

पाच वर्षे सत्तेत नसताना संकट आल्यावर आम्ही जात होतो, त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाही… प्रांत कुठे गेला? …मामलेदार कुठे आहे? असे कधीही म्हटलं नाही किंवा विचारले नाही.

अरे, तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आला आहात?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केलाय.

चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली तेव्हापासून मोठे लोक राज्याचे प्रमुख झाले आहेत. त्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदराव पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला, तर कधीही अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्याकाळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते. याची आठवण देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला करुन दिली.