TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 मे 2021 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना केंद्र सरकारला दिली होती. पण, या केंद्र सरकारची कोरोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची आहे, असा आरोप करत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या समितीतून राजीनामा दिलाय. यावरून केंद्रातील मोदी सरकार कोरोना हाताळण्यात किती गंभीर आहे ? हे लक्षात येत आहे.

मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असून दिवसाला चार हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

संबंधित फोरम कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी तयार केली होती. या फोरममध्ये देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञांचा समावेश केला होता. कोरोनाच्या लढ्यात केंद्र सरकारच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील मागील काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत होते. पण, केंद्र सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार समितीतून राजीनामा दिला. जमील एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

वैज्ञानिकांची ही फोरम जैव प्रौद्योगिक विभागाच्या अंतर्गत येत असून या मंत्रालयाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी अजूनतरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तानुसार, या फोरमने केंद्राला अगोदर पूर्वकल्पना दिली होती की, मार्च महिन्यामध्ये कोरोनाची नवीन लाट येईल. यामुळे अधिक प्रमाणात संक्रमण वाढेल. परिणामी, कोरोना संसर्गाचा वेग वाढून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येणार आहे. तरीही केंद्र सरकारने सल्लागारांच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे गाफिल राहिलेल्या देशाला मार्चपासून कोरोनाचा तीव्र फटका बसलाय.

मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तसेच देशात वैद्यकीय सामग्रीचा हि तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोध पक्षासह सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धीजीवी लोकं केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पण, यानंतर आता पहिल्यांदा केंद्राला सल्ला देणाऱ्या विषाणू शास्त्रज्ञांच्या फोरममधील एखाद्या शास्त्रज्ञाने वेगळं मत मांडलं आहे. फोरमकडून योग्य सल्ला दिला असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं, आहे, असे मतही विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी मांडलंय.