TOD Marathi

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, ते एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती १४० किलोमीटर प्रतितास करण्याच्या बाजूने आहेत. तसेच, यासंबंधी लवकरच संसदेत विधेयक देखील सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, वेगाबद्दल अशी धारणा आहे की, जर कारचा वेग वाढला तर दुर्घटना होईल. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह – २०२१ मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, माझे वैयक्तिक मत आहे की एक्स्प्रेस वे वर वाहनांची वेग मर्यादा वाढवून १४० किलोमीटर प्रतितास केली पाहिजे.

कारच्या वेगाबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, ज्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आहोत. आज देशात असे एक्स्प्रेस वे बनले आहेत की, त्या मार्गांवर कुत्रं देखील येऊ शकत नाही. कारण, मार्गाच्या दोन्ही बाजुने बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करण्यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केले जाईल, असंही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवलं.