TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जून 2021 – मुंबईमध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईकरांची मॉन्सूनच्या पहिल्या पावसामुळे धावपळ झाली आहे. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणे पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईची यंदाही तुंबई झाली आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी अधिक प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झालंय. तर पहिल्या पावसाने लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे. पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवली आहे.

केरळातून मॉन्सून वेगाने महाराष्ट्रात आला. आज एक दिवस आधी मुंबईत दाखल झाला. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने बुधवारपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय.

अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांत म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार पाऊस कोसळतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांत मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरुय.

मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य व हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवली आहे. यासंदर्भातील माहिती मध्य रेल्वेने ट्विट करुन दिलीय.

कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १० वाजेच्या सुमारास अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.