TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 ऑगस्ट 2021 – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि 2019 मध्ये हे लागू झाल्यानंतर आतापर्यंत किती जणांनी तिथे जमीन खरेदी केली?, याची माहिती लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली आहे. यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिलीय.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम शिथिल केल्यानंतर तिथे देशातील सर्व ठिकाणच्या नागरिकांना जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

लोकसभेमध्ये लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे की, जम्मू काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ पासून राज्याबाहेरील दोन व्यक्तींनी दोन मालमत्ता खरेदी केल्यात.

कलम ३७० हटवण्याला काही दिवसांपूर्वी दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. याच्या निमित्ताने देशाने नुकताच दुसरा वर्धापन दिन साजरा केला.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू -काश्मीर आणि लडाख) विभाजन करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शेतीपूरक नसलेली जमीन राज्याबाहेरील लोकांना खरेदी करण्याची परवानगी दिली होती. पूर्वी केवळ जम्मू काश्मीरच्या लोकांना इथली जमीन खरेदी करता येत होती. जम्मू काश्मीरचा स्थानिक रहिवाशी होण्यासाठी नियमांत बदल केले आहेत.

तसेच इतर राज्यांतील पुरुषांनी जम्मू काश्मीरमधील मुलीशी लग्न केले, तर त्यांना तेथील कायमचे रहिवाशी बनवण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांत महिलेच्या पती आणि मुलांना जम्मू काश्मीरचे कायमचे रहिवासी मानले जात नव्हते.