TOD Marathi

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं बंड गेल्या तीन दिवसात थंड होण्याचं नाव घेत नाही. याउलट शिवसेनेच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर एकनाथ शिंदे परत येतील का? अशी शक्यता वाटत होती मात्र आमदार संजय शिरसाट यांच्या वतीने एक पत्र लिहिण्यात आले आणि ते पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं याचा अर्थ काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा बंडखोर गटावर परिणाम झाला नाही. (Ekanath Shinde tweets letter to Uddhav Thackeray)

गेले तीन दिवस महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांनीही अजय चौधरी हेच शिवसेनेचे गटनेते आहेत असं विधान केलं. (Narhari Zirwal stated that Ajay Chaudhari is Legislative party leader) त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला अशा चर्चा होत्या. मात्र आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाची भूमिका समोर केलेली आहे. सर्वच आमदारांची इच्छा असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू असं महत्त्वाचं आणि मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay Raut says, if all mlas wish to come out of MVA, we can)

एकनाथ शिंदे यांनी आपली इच्छा स्पष्ट केली आहे की आपण भाजपसोबत सरकार स्थापन केलं पाहिजे, मात्र काल उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असावा. मात्र आता संजय राऊत यांनी ही भूमिका जाहीर केली आहे की सर्व आमदारांची इच्छा असेल तर महाविकास आघाडी बाहेर पडू, त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय विचार करतात याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज गुवाहाटीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. आपल्यासोबत एकूण 42 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला फक्त 17 आमदारांची हजेरी होती. आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा करत शिंदे आपला वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत.

मात्र, शिंदे गटाने मुंबईत यावं, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करु, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

शिंदे यांना आपला वेगळा गट तयार करण्यासाठी आणखी 37 आमदारांची गरज आहे. तर शिवसेनेच्या 19 पैकी 9 पेक्षा अधिक खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिंदे लवकरच आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी काल रात्री शासकीय निवासस्थान वर्षा सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळेही (Supriya Sule)  उपस्थित राहणार आहेत. आता पुढे काय होणार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.