TOD Marathi

BJP मला संपवत आहे, असं वाटत नाही, पक्षाचा निर्णय मला मान्य – Pankaja Munde ; जे कोणी मंत्री झालेत त्यांचे अभिनंदन

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जुलै 2021 – केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुले मुंडे भगिनी नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. मी कुठेही नाराज नाही, जे कोणी मंत्री झालेत त्यांचे मनापासून अभिनंदन आहे. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाविरोधात मी नाही. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, मला अनेकांचे फोन आले, मेसेज आले. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती. हिना गावित यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु मुंडे यांचे संस्कार आमच्यावर आहेत.

आम्ही कुठेही नाराज नाही. एखाद्याला संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा देणं, आमचं काम आहे. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती. बातम्या येत होत्या की प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. ती चुकीची बातमी होती म्हणून ट्विट करून सांगितले आहे.

त्याचसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील, भारती पवार यांचा फोन आला, त्यांना मी शुभेच्छा दिल्यात. दिल्लीला बोलावणं आलं तेव्हा भागवत कराड यांनीही मला फोन केला त्यांच्यांशीही माझं बोलणं झालं.

माझं लोकांची नाते आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज वैगेरे असं काही नाही. माझ्या नाराजीची काही कारण नाही. मला कुठलाही आक्षेप नाही. पक्षाचा निर्णय सर्वमान्य आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

भाजप मला संपवत आहे, असं वाटत नाही :
तसेच भाजपमध्ये निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेतं.

प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे कष्टाळू आहेत. केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकची मर्यादित नाही तर त्यांचे काम चांगले आहे.

सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्यात. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आलं. पक्षाने घेतलेला निर्णय पटला आहे. भाजप मला संपवत आहे, असं मला वाटत नाही. मी छोटी कार्यकर्ता आहे, त्यासाठी पंतप्रधानापर्यंत मला संपवण्याचा प्रयत्न कसा होईल? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी केला आहे.

मी केवळ वंजारी समाजाची नाही :
गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्याचं काम केलं आहे. मी केवळ वंजारी समाजाची आहे, हे मान्य नाही. मी राज्याची महिला नेता, चांगली वक्ता आहे.

वंजारी समाजातील व्यक्ती मोठा होत असेल, तर मी त्याच्या पाठिशी आहे अन राहणार आहे. पक्षाने भागवत कराड यांना संधी दिलीय. त्यांचा पक्ष संघटनेसाठी फायदा होणार आहे.

भविष्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी त्यांना संधी मिळालीय. त्यामुळे भविष्यात हे दिसेल. पक्ष वाढवण्यासाठी नेते चांगले निर्णय घेतात. पक्ष मजबूत व्हावा, यासाठी निर्णय घेतले जातात. पक्षाच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नव्या लोकांना संधी दिली जातेय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र भाजपला मान्य नाही :
टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असे काही भाजपला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष असं धोरण आहे. मी पणा भाजपमध्ये नाही. आपण, आपण ही संस्कृती भाजप मध्ये आहे.

भाजपच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी हे सांगितलं आहे. पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला दिलीय.

राज्यात मुंडे-महाजन नेतृत्व करत होते, तेव्हा तळागळातील लोकांना एकत्र आणून मुंडे यांनी लोकांना संधी दिली आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.