TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 29 मे 2021 – महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांत येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याअगोदर पावसाला सुरुवात झालीय. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिलीय.

विजांच्या कडकडाटासह तीन तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहणार आहे. तर, सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या तीन तासात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, उंच झाडाखाली थांबू नये, असे आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

तर, हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस असून यात अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वसमत, औंढा ,कळमनुरी या तालुक्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झालाय.