TOD Marathi

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेससाठी हा मोठा आघात म्हणावा लागेल.

हार्दिक पटेलांची पक्षावर नाराजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवस सुरु होत्या. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हार्दिक पटेल ट्विट करत म्हणाले की, आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असा आशावादही पटेल यांनी यावेळेस व्यक्त केला.

दरम्यान राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून चिंतन शिबिर पार पडलं. त्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल पक्षाला रामराम ठोकणारे दुसरे नेते आहेत.