TOD Marathi

मुंबई: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं दिवाळी अंधारात जाईल अशीच परिस्थिती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण राज्याकडून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी केला आहे.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी राज्य सरकारने मदतीचा हात दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि दिवाळी आनंदात साजरी होईल. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे.

शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.