TOD Marathi

मागील 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही ; Urban Development Department चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 जुलै 2021 – मुंबईतील चेंबूर – वाशी नाका परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर दरड कोसळल्याने आज सुमारे 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र, नगरविकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कारण, मागील 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजना केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यावरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर टीका होत आहे.

सध्या मुंबईमध्ये 22 हजार 483 कुटुंब डोंगराळ भागात राहत आहेत. या सर्व नागरिकांचा जीव धोक्यात आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हंटलं आहे. त्यांनी माहिती अधिकारद्वारे मिळालेल्या माहितीच्या जोरावर सरकारवर हे गंभीर आरोप केलेत.

सप्टेंबर 2011 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाला कृती आराखडा बनविण्याचे आदेश दिले होते.

आता दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप नगरविकास विभागाने कोणत्याही प्रकारचा कृती आराखडा म्हणजेच ॲक्शन प्लॅन बनवला नाही, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलाय. त्यामुळेच की दुर्घटना घडली आहे, असे बोलले जात आहे.

डोंगराळ भागात राहणारा घरांवर दरड कोसळू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप सध्या राज्य सरकारसह महानगरपालिकेवर होत आहे.

1992 ते 2021 या काळामध्ये सुमारे 290 निष्पाप नागरिकांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. आता तरी सरकार उपाययोजना करून नागरिकांचा जीव वाचणार का? असाच प्रश्न अनेकांना पडतोय.