TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 ऑगस्ट 2021 – देशामध्ये आज सर्वत्र 75 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण झालं.

यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी कोरोना स्थितीवर भाष्य केलं. पुढचा स्वातंत्र्यदिवस कोरोनामुक्त वातावरणामध्ये साजरा करू, अशी प्रतिज्ञा घेण्याचे त्यांनी आवाहन केलं. महाराष्ट्रात कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. पण, परिस्थिती बिघडली तर पुन्हा राज्यामध्ये लॉकडाऊन लावणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

16 ऑगस्टपासून राज्यामध्ये अनेक निर्बंधातून शिथिलता दिली आहे. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. काही निर्बंध शिथिल केलेत. पण, संकट टळले आहे, असं आपण म्हणू शकत नाही. जगात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, लोकांनी धोका लक्षात घ्यावा.

मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. आपण त्याच्याशी लढत आहोत. आरोग्य सुविधा वाढवत आहे. पण, ऑक्सिजनची कमतरता चिंता वाढवू शकते. ऑक्सिजनचा पुरवठा लक्षात घेऊन आपण निर्णय घेतलाय. त्यामुळे उद्या मागणी वाढली आणि आपल्याकडे तेवढा पुरवठा नसेल तर कदाचित पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

75 वा स्वातंत्र्यदिवस निम्मित ध्वजारोहण –
मुंबईमधील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं. विधानभवनामध्ये परिषदेचे सभापती रामराज नाईक निंबाळकर यांनी तर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशांनी ध्वजारोहण केलं आहे.

मुख्यमंत्री मंत्रालयानंतर विधानभवन आणि उच्च न्यायालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोविडमध्ये सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविका आणि डॉक्टर्सशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.