TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 18 मे 2021 – सध्या समुद्राकडून जमिनीकडे वारे जोराने वाहत आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ निर्माण होतात आणि हेच वारे एका बाजूकडून दुसरीकडे सरकू लागतात. त्यांची सरकण्याची गती हि अतिशय वेगाने असल्यामुळे त्याला आपण सोसाट्याचा वारा असं देखील म्हणतो. मात्र, शास्त्रीय भाषेत त्याला विशिष्ट दरवर्षी नाव दिली जातात. त्याप्रमाणे आपण त्यांना संबोधतो. सध्या जे चक्रीवादळ आहे त्याला तौक्ते चक्रीवादळ असं म्हंटलं आहे. म्हणून नेमकं आपण पाहू, चक्रीवादळ तयार होतं तरी कसं ?

सध्या देशाच्या किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रामध्ये आहे. या वादळाच्या प्रभावामुळे रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये वेगवान वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे या भागासह मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.

मागील दोन वर्षांत चक्रीवादळं मुंबईजवळून गेल्याचं आपण ऐकलं असेल. 2020 साली देखील निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला बसला होता. यापूर्वी 2009 साली कोकणात फयान नावाचं चक्रीवादळ धडकलं होतं. आपल्या कोकण-मुंबईजवळ येणारी ही चक्रीवादळं तयार कुठे आणि कशी होतात? ती एवढा प्रवास करून इथवर कशी येतात? असा प्रश्न आपल्याला पडला असेल.

आपल्याला माहित आहे ना, पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त व दक्षिणेला मकरवृत्त आहे. विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या या भागाला उष्णकटीबंधीय प्रदेश असे म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत ट्रॉपिकल रीजन.

इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळे इथल्या समुद्राचं पाणी अधिक प्रमाणात तापतं. आता पाणी जास्त तापलं की, त्याची वाफ बनते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरती जाते. आता ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो, अर्थात तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरून काढण्यासाठी येते.

ही प्रक्रिया सतत सुरू असते, म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती अधिक दाबाच्या प्रदेशातले वारे फिरू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं, म्हणून त्याला आपण चक्रीवादळ असं म्हणतो.

जाणून घेऊया, चक्रीवादळाची दिशा :
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात फिरते, याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे व वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.
ही वादळं अनेक दिवस व शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येत नाही. मात्र, त्यांचा अंदाज बांधता येतो. जसे दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतं. किंवा अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतं.

चक्रीवादळाची नाव कशी ठेवतात :
अमेरिकेमध्ये जी चक्रीवादळं येतात, त्यांना हरिकेन असं म्हणतात. आणि आपल्याकडच्या वादळांना सायक्लोन असं म्हणतात. तर, अटलांटिक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन असं म्हणतात. तर आपल्याकडे म्हणजे हिंदी महासागरातल्या चक्रीवादळांना सायक्लोन असं म्हणतात. तर प्रशांत महासागरातल्या चक्रीवादळांना टायफून असं म्हणतात. प्रत्येक चक्रीवादळाला एक नाव देतात आणि ते नाव देण्याची एक पद्धत आहे.

चक्रीवादळ कधी थांबतं?
चक्रीवादळाच्या मध्यभागी असणाऱ्या केंद्राला ‘आय’ किंवा ‘डोळा’ असं म्हणतात. शेकडो किलोमीटरचा महासागरावरून प्रवास केल्यानंतर या चक्रीवादळाचा परीघ काही किलोमीटर लांबीचा होत जातो. पण, त्याचा वेग आणि शक्ती किनाऱ्यावर धडकल्यावर कमी होते. या धडकण्याला ‘लँडफॉल’ असे म्हणतात.

चक्रीवादळ एकदा का किनाऱ्याला लागलं की, चक्रीवादळाला सतत होणारा आर्द्र हवेचा पुरवठा थांबतो. चक्रीवादळ संपत असलं तरी वाऱ्याच्या वेगामुळे व पावसामुळं किनाऱ्यावर नुकसान होतं. म्हणून अशावेळी योग्य ती काळजी घ्यावी लागते.