TOD Marathi

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयावरून भाजपने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. हा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ठाकरे सरकारने परप्रांतीयासंबंधी हा निर्णय घेतला, पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलेय. तर महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड, मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत का, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी केला होता.

भातखळकर यांनी सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत ते ट्वीट करून म्हणाले कि, मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा माझा मुख्यमंत्र्याना सवाल आहे. सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, अशी माहिती त्यांनी दिली आहे.