TOD Marathi

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारले आहे.  या बंडाशी भाजपचा कसलाच संबंध नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून भाजपने अत्यंत सावध आणि शांत भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण, भाजपने आमचा कोणताही संबंध नाही असं वारंवार सांगितलं. मात्र, आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती समोर येतीय.

देवेंद्र फडणवीस यांनी गुवाहाटीतील आमदारांना विश्वास देण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. शनिवारी रात्री जवळपास 15 आमदार फडणवीस यांच्याशी बोलले, असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांची चौथ्यांदा दिल्लीवारी असणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली असून सकाळीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राजभवनावर कोश्यारी दाखल झाले आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या गटात सामील दरम्यान, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहोचले आहे. उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.