TOD Marathi

बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस विभागाला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. यात त्यांनी ३८ आमदारांची यादी देत या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता सरकारची असल्याचं नमूद केलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. (Eknath Shinde writes a letter to CM Uddhav Thackeray and HM Dilip Walse Patil)

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.”

 

एकनाथ शिंदे यांनी पत्रात काय म्हटलंय ?

एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” “आम्हाला सुरक्षा देण्याचं कारण आमच्या जीवाला असलेला धोका आहे. आम्ही कोणत्या बाजूचं राजकारण करतो यावरून सुरक्षा देण्याचा निर्णय होत नाही. असं असलं तरी ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे,” असा आरोप या पत्रात करण्यात आला.

यामध्ये पुढं असंही म्हटलं आहे, “पोलीस सुरक्षा काढून आमच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे. सोबतच मविआचे नेते आपआपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहेत. याबाबत २३ जूनला माध्यमांमधूनही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संजय राऊत यांनी महाराष्ट्र सोडणाऱ्या आमदारांना पुन्हा महाराष्ट्र येणं आणि महाराष्ट्रात फिरणं अवघड जाईल.”

“या वक्तव्यानंतर आणि आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर काही वेळातच आमच्या दोन सदस्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. महत्त्वाच्या सुरक्षा काढून घेण्याचा असा प्रकार पंजाबमध्येही झाला होता. त्यानंतर तेथे या व्यक्तींना गुंडांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं. महाराष्ट्रात आमदारांची सुरक्षा काढण्याचे असेच परिणाम होतील,”

“प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा द्यायला हवी ती तात्काळ द्यावी,” अशी मागणीही एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी केली. तसेच आमच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे असे मविआचे नेते जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.