TOD Marathi

टिओडी मराठी, ठाणे, दि. 19 जुलै 2021 – मुंबईसह उपनगरामध्येही पावसाने झोडपले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथे डोंगर परिसरात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून आणखी काहीजण ढिगाऱ्यांखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले असून शोधकार्य सुरू आहे.

कळवा पूर्व इथल्या घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झालं आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले आहे, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे, असे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. सध्या मदतकार्य युद्धा पातळीवर सुरू आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने कहर केलाय. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे ठाण्यातील अनेक भागात पाणी साचलंय.तर ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव ओसंडून वाहतोय. त्यामुळे शहराला पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

याशिवाय हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग व ठाणे पश्चिम बाजारपेठ ही पाण्याखाली गेलीय. तसेच ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्गदेखील पाण्याखाली गेलाय.

गेल्या तीन दिवसांपासून हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकीचे मार्ग बदलले आहेत. पण, मार्ग बदलल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.