TOD Marathi

मुंबई: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच सरकार जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात ते बोलत असतांना म्हणाले की, एक्स्प्रेस वे १ हजार ३८० किमी लांबीचा असेल आणि आम्ही तो नरिमन पॉईंट पर्यंत नेण्याचा देखील विचार करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दिल्ली – मुंबई महामार्ग राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी जिल्ह्यांमधून जात आहे. त्यामुळे या भागांचा विकास होणार त्याचसोबत, तिथल्या लोकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असंही गडकरी या वेळी म्हणाले.

मुंबई ते दिल्ली मधील अंतर कमी करण्यासाठी ट्रकने सुमारे ४८ तास आणि कारने २४ ते २६ तास लागत आहेत. मात्र, येणाऱ्या वर्षभरात दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी लागणारा हा वेळ कमी होणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबईमधील हे अंतर कापण्यासाठी एखाद्या ट्रकला अंदाजे १८ ते २० तास आणि कारला १२ ते १३ तास लागतील, अशी माहिती त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली आहे.