![](https://todmarathi.com/wp-content/uploads/2021/05/sambhaji-raje.jpg)
टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 जून 2021 – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारताने काळजी अधिक घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर घातलेली बंदी 31 जुलै 2021 पर्यंत वाढवली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणांवरील प्रतिबंध एका महिन्यासाठी वाढवले आहेत.
मात्र, मोजक्या मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड उड्डाणांना अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे 23 मार्च रोजी भारतात शेड्यूल्ड आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे रद्दबातल ठरविली होती.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आपल्या आदेशात असं म्हटलंय की, 31 जुलै, 2021 च्या 23:59 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध कायम राहणार आहेत.
मागील वर्षी 23 मार्च रोजी कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू केलेले निर्बंध आजही कायम आहेत. मात्र, प्रवाशांच्या अखंड वाहतुकीसाठी अनेक देशांशी द्विपक्षीय हवाई बबल करारानुसार भारताने विविध आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली आहेत.
भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमीरात, केनिया, भूटान आणि फ्रान्स यांसहित 27 देशांसोबत एअर बबल करार केलाय. दोन देशांदरम्यान एअर बबल अंतर्गत त्यांच्या विमान कंपन्या त्यांच्या प्रदेशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवू शकतात.
— DGCA (@DGCAIndia) June 30, 2021