TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 जुलै 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण, ही भेट पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांना पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती देण्यासाठी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मलिक म्हणाले, मागील वेळी भाजपने विचारलं होतं. महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा स्पष्ट नकार दिला होता.

आम्ही तेव्हाही भाजप सोबत गेलो नाही आणि त्यानंतर आम्ही महाआघाडी स्थापन केली. आज दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणार असलेल्या बैठकीबाबत एच.के.पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे काही जणांनी पवार आणि फडणवीस भेट झाली आहे, अशी माहिती पसरवली. पण, अशी कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा आहे, असेही मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट ही पूर्वनियोजित होती. पियुष गोयल राज्यसभा नेते झाले, त्यांनी देखील शरद पवार यांची भेट झाली. हा एक केवळ शिष्याचाराचा भाग आहे.

संरक्षणमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये पवार यांच्यासोबत ए. के. अँटनी देखील होते. सीमेवर ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर चर्चा झाली आहे, असे मलिक यांनी सांगितलं.

आज पंतप्रधान यांच्यासोबत बैठक ठरलेली होती. सहकारी बँक अधिनियम बदलण्यात येत असून त्यावर चर्चा झाली आहे. आरबीआयला एवढे अधिकार कसे ?, नव्या नियमानुसार कोणीही शेअर होल्डर शेअर विक्री करू शकतात?.

या नियमामुळे अनेक मोठे उद्योजक येथील सहकार मोडीत काढेल. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले होते. याबद्दल ही भेट घेतली, असंही मलिक म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवावे. हा विषय अत्यावश्यक आहे. यावर पंतप्रधान यांनी विचार करावा, याविषयी ही बैठकीमध्ये चर्चा झाली आहे, असंही मलिक म्हणाले.