TOD Marathi

टिओडी मराठी, भंडारा, दि. 13 ऑगस्ट 2021 – भारत देशात 2014 पासून केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याच्या प्रयत्न सुरू केलाय. भारतीय संविधानाच्या आधारावर कॉंग्रेसने सत्तेचा उपयोग देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला आहे. मात्र, आत्ताच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने पिटेझरी आणि मालू टोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाप्रसंगी नाना पटोले बोलत होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेसची विचारधारा हीच देशाला वाचवू शकते, म्हणून संपूर्ण राज्यभर दौरे सुरू आहेत. ही भविष्याची तयारी असून माझ्या क्षेत्रातील जनतेने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, करोनामुळे आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विकास कार्य मंदावले आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्य शासनाला हक्काचा निधी देत नाही. तरीही राज्य शासन सर्वसामान्यांच्या हिताचे संरक्षण करीत आहे. 2012 साली बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत यंदा जंगलव्याप्त आणि दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाज बांधवांसाठी सुरू केलेली आहे.

या योजनेमध्ये कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर दोन हजार रुपये रोख जमा केले जातात. तसेच दोन हजार रुपयांचे जीवनावश्‍यक वस्तूचे किट लाभार्थ्यांना दिले जाते.

राज्यातील सुमारे 12.50 लाख आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने मोहा फुलावरील बंदी हटवली आहे. त्यावर आधारित उद्योग निर्मिती करण्याची योजना राबवून जंगलव्याप्त परिसरातील महिलांना आणि युवकांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तसेच आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकृती, वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, याकरीता शासन स्तरावर नियोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.