TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 जून 2021 – कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द केल्या आहेत. आता सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सुप्रीम कोर्टासमोर सादर केलाय.

सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍िती आज सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केलाय. यावेळी सीबीएसईने सांगितलं की, अंतिम निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. सीबीएसईचे निकाल 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप असेल त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देणार आहे, असे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.

सीबीएसईने म्हटले की, दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण घेतले जातील. तर अशा प्रकारे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाणार आहे.

तसेच बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनविण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के व बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल तयार केला जाईल.

कोरोनामुळे सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा रद्द केली होती. निकाल बनविण्यासाठी 13 सदस्यीय समिती बनविण्यात आली होती. या समितीने निकालाचा फॉर्म्युला आज सुप्रीम कोर्टात सादर केला. तर, बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार आहेत, असे सरकारने कोर्टात सांगितलं आहे.