TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 ऑगस्ट 2021 – पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतातील ग्वादर या शहरामध्ये बॉम्बस्फोट झाला असून यात चीनच्या 8 इंजिनिअर्सचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबान्यांच्या हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. हा बॉम्बस्फोट बलोच फायटर यांनी घडवून आणला आहे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानात चीनी इंजिनिअर्सना लक्ष्य करत झालेला हा दुसरा बॉम्ब हल्ला आहे. याअगोदर चीनी इंजिनिअर्सवर कोहिस्तान जिल्ह्याच्या दासु परिसरात हल्ला झाला होता. बसमधून ते लोक परतत असताना त्यांना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात चीनच्या 9 इंजिनिअर्सचा समावेश होता.

या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीनचे संबंधांत अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाकिस्तानने बसमध्ये झालेल्या स्फोटाला तांत्रिक बिघाडाचे कारण देत झालेली दुर्घटना सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर भारतावर आरोप केला होता. यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले होते.

मात्र, चीनने इम्रान खान यांच्यावर विश्वास न ठेवता स्वत:ची टीम तपासासाठी पाठवली होती. तर चीनने पाकिस्तानला सुनावलं होतं की, आपल्या कर्मचाऱ्यांची सूरक्षा सुनिश्चित करायला हवीय. मात्र, आज झालेल्या हल्ल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, पाकिस्तान त्यात कमी पडलं आहे.