TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 ऑगस्ट 2021 – गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. आज राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार होती. पण, नियोजित कार्यक्रमांमुळे राज्यपालांनी त्यांची भेट नाकारली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. तसंच, ‘जर राज्यपालांनी आमदारांची यादी मंजूर केली तर भाजप फुटणार आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

आज राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. पण, संध्याकाळपर्यंत नियोजित कार्यक्रमांमुळे ही भेट होणार नाही. तर, दुसरीकडे, नाना पटोले यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधलाय.

याबाबत ‘हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे की, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा. पण, राज्यपाल हे दिल्लीला गेलेत. त्यानंतर आता भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय केला आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार होते. हे बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. पण, राजभवनाकडून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

सध्या राज्यपाल आता चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर जाणार आहे. शुक्रवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होणार असून दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेट घेणार आहेत. दिल्ली दौरानंतर ते उत्तराखंड येथे देखील जाणार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना चार दिवसानंतर भेट आता देणार आहेत, असे समजते.

त्याअगोदर आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती, त्यावेळी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल यांना फोन लावला. तेंव्हा राज्यपाल म्हणाले 6.30 वाजेच्या सुमारास या. पण, प्रसार माध्यमांमध्ये बैठक रद्द झाली आहे, असे वृत्त आल्यामुळे ही भेट रद्द केली. त्यामुळे, अधिकृत भेटीची वेळ ठरवण्यासाठी मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. राज्यपालांशी चर्चा करून राजभवन येथून नार्वेकर बाहेर पडले.