TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 जुलै 2021 – भाजपला तळागाळात पोहचविण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी अनेक प्रयत्न केले होते. त्यांच्यामुळे भाजप देखील सक्षम पक्ष म्हणून राज्यात होता. मात्र, त्यांच्या नंतर त्यांच्या कन्या यांनीही भाजपसाठी योगदान दिलं आहे. मात्र, भाजपनं खासदार प्रीतम मुंडे यांना डावललं आहे का?. केंद्राच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांचं नाव नाही. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडला. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार सोपविला आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या चेहऱ्यांकडे हा कार्यभार दिला आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. आतापर्यंत सुमारे १२ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलेत. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती.

यात नारायण राणे, प्रीतम मुंडे, हिना गावित, कपिल पाटील आदी नेत्यांचा समावेश होता. मात्र, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून काढल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून या वृत्ताला अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटलं की, खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली, ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.

एकंदरीत संभाव्य मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये ज्यांचा समावेश होणार आहे. त्यांना दिल्लीत बोलविलं आहे. मात्र, प्रीतम मुंडे मुंबईत असल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना भाजपनं डावललं आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.