TOD Marathi

राज्यसभा निवडणूक हे भाजपा आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मतही महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद आणि त्यांना असलेल्या अपक्ष आमदारांचा पाठिंबा पाहता सत्ताधाऱ्यांचे पारडे जड मानले जात आहे मात्र असं असलं तरी भाजपनेही सर्व प्रयत्न या निवडणुकीसाठी केले आहेत. त्यामुळे भाजप महाविकास आघाडीचे एखाद्या आमदाराला गळाला लावण्याचा किंवा एखादे मत कमी कसे होईल, यासाठीही प्रयत्नशील आहे. साधारण सकाळी नऊ वाजल्यापासून विधानभवनात राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या आमदार, मंत्री यशोमती ठाकूर यांचे मत बाद ठरवले जावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

महाविकास आघाडीची ही दोन मतं बाद ठरल्यास महाविकास आघाडी अडचणीत येऊ शकते. (Rajya Sabha Election 2022 voting) राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचेही पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले आहेत. त्यांच्याकडून मतदानप्रक्रियेवर लक्ष ठेवले जातय. भाजपचे पोलिंग असलेल्या पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदारांनी आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती थेट त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद करण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली. त्यामुळे आता ही मतं बाद ठरवण्यात येणार का, हे पाहावे लागेल. यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागू अशीही भाजपने भूमिका घेतली आहे.

भाजपची (BJP Maharashtra) ही मागणी मात्र फेटाळण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत झालेले सर्व मतं ही वैध आहेत हे घोषित करण्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मात्र महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार आहेत त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत अशी भूमिका घेत आत्मविश्‍वास दाखवलेला आहे.