TOD Marathi

टिओडी मराठी, सातारा, दि. 8 जुलै 2021 – नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यामध्ये नव्या एकूण 43 मंत्र्यांची नावे जाहीर केली होती. या यादीमध्ये 4 मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. यामध्ये खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि प्रीतम मुंडे नावं नसल्यामुळे त्यांना भाजपने डावललं का? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी असल्याचं समजत आहे.

राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसले यांना मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न देता डावलले आहे, असे आढळत आहे.

भाजपने अथक प्रयत्नानंतर खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये सामिल करून साताऱ्यामध्ये आपली ताकत वाढवली. उदयनराजे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले.

लोकसभेची पोटनिवडणूक पुन्हा लागल्यानंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा झाली. पण, उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्यामुळे उदायनराजेंचा जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर ही त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली.

पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात उदयनराजे भोसले यांना घेतले जाईल, अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती. अशा चर्चा ही जोरदार रंगल्या.

पण, आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत उदयनराजे भोसले यांना कुठेही स्थान दिले नाही. उलट त्यांना राजकीय डाव टाकून डावललं आहे, असं चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यात कमालीची नाराजी पसरली आहे.