TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 8 जुलै 2021 – भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळाप्रकरणी पुण्यात संशयित आरोपी म्हणून भाजपच्या जळगावमधील आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून मुख्य आणि संशयित आरोपींची धरपकड सुरु होती. यातील काही जणांना अटक देखील केली आहे.

बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या जिंतेद्र कंडारेला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागतील असा अंदाज होता. त्यानुसार पोलिसांनी भाजपचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मागील महिन्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे विभागातंर्गत येणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेनं सुमारे १३ जणांना अटक केली आहे. यात मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारेचाही समावेश आहे. याप्रकरणी पथकाने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही छापेमारी केली होती.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी याविषयी माहिती दिली आहे. चंदूलाल पटेल यांच्याविरुद्ध मागील महिन्यात अरेस्ट वॉरंट बजावलं आहे. छापेमारी केल्यानंतर वॉरंट बजावलेलं होतं. पण, ते फरार झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

असं आहे हे प्रकरण :
भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजेच बीएचआर मल्टी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे, हे समोर आले होते. या संस्थेच्या देशातील सात राज्यांत २६४ शाखा असून, २८००० हजार ठेवीदारांच्या ११०० कोटींच्या ठेवी आहेत. मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा सन २०१५ मध्ये समोर आला होता.

यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती.

या अवसायकाने भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता या मालमत्ता काही ठराविक लोकांना मातीमोल भावात विकल्या.

या मालमत्ता विक्रीबाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करुन बनावट दस्ताऐवज बनविले, असा पोलिसांना संशय आहे. याशिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार केला आहे, अशा तक्रारी ठेवीदारांकडून केल्या जात होत्या.

या संदर्भात काही संचालकांसह अवसायकांवर गुन्हा दाखल केला होता. यातील काहींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. यात जळगाव शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे, संजय तोतला, तर जामनेरमधील जयश्री मणियार, राजेश लोढा, छगन झालटे आणि भुसावळ इथल्या आसिफ तेली यांचा समावेश आहे.