TOD Marathi

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन वर्षाच्या अंतराने केलेल्या या नियोजनात अनेक त्रुटी आढळून आल्याचे दिसून येत आहे.

आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. ऐनवेळी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच, परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली.

दरम्यान या गोंधळाची माहिती विद्यापीठ प्रशासनाला मिळताच परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा पथकासह परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पेपर बारा वाजेपर्यंत सुरू झालेला नव्हता. लवकरात लवकर यातून मार्ग काढू. तसेच, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.