TOD Marathi

मुंबई : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. (Second day of Maharashtra State Assembly Special Session) कालपर्यंत ठाकरेंच्या गटात असलेले हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले. त्याविषयी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, “तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, ते तर तेव्हा टीव्हीवर रडलेले ना..” असं म्हणत टोला लगावला. (ADITYA THACKERAY ON SANTOSH BANGAR)

बंडखोर आमदार फुटल्यानंतर संतोष बांगर मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले होते. ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, त्या आमदारांना त्यांची बायकोसुद्धा सोडून जाईल, त्यांच्या मुलांना कोणी बायका देणार नाही असं वादग्रस्त वक्तव्यही बांगर यांनी केलं होतं.

आमच्या व्हिपचं उल्लंघन झालं आहे. आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाद मागणार, याचिका करणार आहोत. व्हिप मोडला त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे. सकाळी वाहतूक कोंडीमुळे आमची धावपळ झाली, पण सगळे व्यवस्थित पोहोचले. काही जण बाहेर राहिले, दरवाजे लॉक झाले, त्यामुळे त्यांचं मत मिळू शकलं नाही, म्हणून महाविकास आघाडीची मतं कमी झाली, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

जे पळून गेलेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. मात्र ते कधीही होऊ शकत नाही. ते सुरत, गुवाहाटी, गोव्यात पळून गेले, अजून पुढे कुठे जातील, माहिती नाही, ते जोपर्यंत बबलमध्ये आहेत, तोपर्यंत ठीक आहे, मात्र मतदारांना भेटतील तेव्हा त्यांच्या मनात काय आहे, हे बघायचंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

कुर्ल्यातील बिल्डिंग पडली, तेव्हा मी मध्यरात्री गेलो, पण तिथले आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकच अवैध आहे, आमचा व्हिप कायम आहे, असंही आदित्य म्हणाले.