TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जुलै 2021 – रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीय. या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तत्काळ उपलब्ध केली आहे. सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवलीय.

महाराष्ट्र राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेवून आहेत.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यामध्ये सहभागी झाले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे व जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने आणि दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटलाय. तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आणि खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत.

स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यात सहकार्य करावे.

अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पवार केले आहे.