TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 19 जून 2021 – पुण्यामध्ये निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिकांची पर्यटनस्थळी तसेच बाजारपेठासह अन्य ठिकाणी गर्दी होत असताना दिसत आहे. अशा पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच कडक निर्बंध लावण्याचे आदेश काढण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पुण्यातील सध्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, खोपोली अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत आहे, असे सांगितलं आहे. मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिक असं का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, असे पवार म्हणाले.

अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण, काही जण ट्रेकिंगला जात आहेत. पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावे लागेल. तसे आदेश काढावे लागतील,’ असा इशारा अजित पवारांनी दिला.

करोना संकट हळूहळू कमी होत असले तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील, असा निर्णय घेतला आहे. केवळ सोमवार ते शुक्रवारी दुकानं सुरु राहणार आहेत.

परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल केला जाईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का? असा प्रश्न पडला असेल. कारण, महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण अधिक आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले.